stock
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच जुलैला सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात कमालीचे नकारात्मक वातावरण आहे. दोन ते पाच कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांवर तीन टक्के कर अधिभार व पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर सात टक्के कर अधिभार आकारण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला. या नियमाच्या कक्षेत विश्वस्त संस्थेंतर्गत नोंदणी केलेल्या एफपीआयही (विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) येत असल्याने या गुंतवणूकदारांमध्ये मोठी नाराजी आहे. या अर्थसंकल्पातील अन्य काही निर्णयही गुंतवणूकदारांसाठी अप्रिय ठरल्याने निर्देशांकात सतत घसरण होत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मंगळवारी २७७ अंकांची वृद्धी साधली असली तरी गेल्या आठवड्यात सेन्सेक्सची ७६४ अंकांनी घसरण झाली. या पडझडीमुळे १० शीर्षस्थ कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या बाजार भांडवलात तब्बल ८९,५३५ कोटी रुपयांची घट झाली. चालू महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांतच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफपीआय) २,८८१ कोटी रुपयांची गुंतवणूक माघारी नेली. या गुंतवणूकदारांनी जुलैमध्ये सुमारे तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर या स्थितीचा कमालीचा परिणाम होत असून हे गुंतवणूकदार शेअर बाजारापासून चार हात लांब राहणे पसंत करतात. शेअर बाजारातील गुंतवणूक ही नेहमीच लालसा व भीती या दोन घटकांवर अवलंबून असते. निर्देशांकात घसरण होत असताना अनेक संधी साधता येतात. मात्र त्यावेळी काही गोष्टी टाळणे आवश्यक ठरते.
चढउतार व अस्थिरता हे शेअर बाजाराचे प्रमुख लक्षण आहे. या चढउतारांमुळे घाबरून जाण्यात अर्थ नसतो. शेअर बाजारातील गुंतवणूक ही संयमाची कसोटी असते. या गुंतवणुकीकडे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून कधीच पाहू नये. सल्लागारांच्या साह्याने उत्तमोत्तम व सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग ओळखून त्यात दीर्घकालीन गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरते. दीर्घकालीन विचार करता हे समभाग लक्षणीय परतावा देतात असा इतिहास आहे. त्यामुळे निर्देशांकातील चढउताराने विचलित होऊ नये.
आर्थिक उद्दिष्टे 
दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शेअर बाजारातील गुंतवणूक अतिशय उपयुक्त ठरते. कमी जोखीम असलेले व चांगला पूर्वतिहास असणारे समभाग आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे निर्देशांक कोसळल्यानंतर समभागांचे मूल्य कमी झाले तर ते समभाग विकण्याचा निर्णय चुकीचा ठरू शकतो. अशाने तुमच्या एकंदरीत दीर्घकालीन आर्थिक नियोजनाला फटका बसू शकतो.
पोर्टफोलिओ आढावा 
शेअर बाजारात चढउतार होत असताना आपल्या पोर्टफोलिओचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते. यामुळे आर्थिक उद्दिष्टपूर्ती कितपत साध्य झाली आहे याचा अंदाज येतो. आपल्या पोर्टफोलिओमधील समभागांचे मूल्य घटल्यानंतरही ते उद्दिष्टांच्या किती जवळ वा लांब आहेत हे त्यातून समजते. आपल्याकडे जमा असलेला एखाद्या समभागाचे मूल्य सतत घटत असेल तर आपला निर्णय चुकला आहे असे समजावे. भविष्यात योग्यवेळी हा समभाग विकणे योग्य ठरते.
नवी खरेदी 
मंदी हीच संधी हा मंत्र लक्षात ठेवा. तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील व निर्देशांक कोसळल्यानंतर चांगल्या कंपन्यांच्या समभागांचे मूल्य घटले असेल तर ते समभाग विकत घेणे केव्हाही चांगले. मात्र अनेक दुय्यम दर्जाचे व अपरिचित कंपन्यांचे समभाग अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत म्हणून खरेदी करणे व्यवहार्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.