एकदा का आपल्या मुलांना शाळेत टाकलं की पालकांची जबाबदारी संपते कशी? शाळेच्या बाबतीत काही पालक अगदी दुर्लक्ष करण्याची, तर काही पालक शाळेच्या गोष्टीत नको इतकी लुडबुड करण्याची टोकाची भूमिका का स्वीकारतात? मुलं आणि शाळा या सहसंबंधातली ‘संवादाची कडी’ पालक होणार की नाही?

शाळा निवडायची वेळ आली की, तमाम पालकांच्या पोटात हल्ली गोळा येतो. छातीत धडकी भरते आणि डोकं भिरभिरायला लागतं. कारण मुळात शाळा निवडणं आणि निवडलेल्या शाळेत आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण आणि वागणूक मिळतेय की नाही यावर लक्ष ठेवणं या दोन्ही गोष्टी अतिशय किचकट आणि कटकटीच्या बनल्या आहेत.

परवाच खूप दिवसांनी आईकडे चक्कर मारली. सोबत माझा पाच वर्षांचा मुलगा होता. आई म्हणाली, ‘मग कधी चालू होतेय शाळा?’

बाप रे.. माझ्या पोटात तर गोळाच आला. तसं मी आईला म्हणालेही. तर ती हसली आणि म्हणाली, ‘आमच्यावेळी फार सोपं होतं बघ सगळं. शाळा कुठली निवडायची याबाबत प्रश्न पडायचा तो फक्त माध्यमाचा. म्हणजे इंग्रजी माध्यमाची शाळा निवडायची की मराठी? बाकी कसलेही प्रश्न नव्हते; पण तुमचं अवघड आहे बुआ.’

खरंच आपलं इतकं अवघड आहे का? शाळा निवडणं आणि निवडलेल्या शाळेशी संवाद असणं या दोन्ही गोष्टी खरंच इतक्या कठीण आहेत का?

म्हटलं तर हो आणि म्हटलं तर नाही.

म्हणजे होतं काय की ४0-५0 हजार रुपये भरून बालवाडीतल्या मुला-मुलींचे प्रवेश शाळेत केलेले असतात. (हा आकडा वाचताना कितीही भयावह वाटलं तरी वस्तुस्थिती हीच आहे. इंग्रजी माध्यमाच्या कुठल्याही शाळेत साधारण याच टप्प्यातली फी असते आणि हल्ली तर मराठी माध्यमांच्या शाळेतही बालवाडीसाठी प्रवेश मिळवायचा असेल तर २0-२५ हजार रुपये डोनेशन मागतात. त्यामुळे इंग्रजी शाळा महाग आणि मराठी शाळा स्वस्त, असला काही भ्रम कुणी बाळगू नये.) तर इतके प्रचंड पैसे मूल बालवाडीत किंवा प्राथमिक शाळेत असतानाच पालकांनी खर्च केलेले असतात. त्यामुळे आपल्या मुलांना शाळेत घातलं की विषय संपला, बाकी काय ते शाळा आणि शिक्षक बघून घेतील आणि आपण फक्त मुलाचा अभ्यास होतोय की नाही वेळेवर, याकडे लक्ष पुरवायचं. पण हल्ली परिस्थिती तशी उरलेली नाही. आजची पालकांची पिढी ज्यावेळी शाळेत होती त्यावेळसारखं वातावरणही शाळांमध्ये राहिलेलं नाही. शिक्षकांचे दृष्टिकोन बदलले आहेत. शाळांचे व्यावसायिकीकरण झालेलं आहे. आजूबाजूचं वातावरण गढूळ आहे. अशावेळी मुलांना शाळेत घातलं आणि विषय संपला, असं असूच शकत नाही. कुठलाही पालक अशाप्रकारे निदान आज तरी विचार करू शकत नाही.

ज्याप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन जग्ण्यात आहार-विहाराचा, पथ्यपाण्याचा विचार करतो, तसाच शाळांबरोबर असणार्‍या संबंधांचा आणि पालकांच्या दृष्टिकोनातील पथ्यपाण्याचाही विचार केला पाहिजे. ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टी शाळेवर सोडून उपयोगाच्या नाहीत त्याचप्रमाणे सतत शाळेच्या कामकाजात लुडबुड करूनही चालत नाही. कुठल्या टप्प्यात पालकांनी शिरायचं आणि कुठे थांबायचं हे पालकांनाही समजलं पाहिजे.

मला आठवतंय, माझ्या मुलाच्या ज्युनिअर केजीच्या पालक-शिक्षक मिटिंगच्यावेळी एक पालक ज्युनिअर केजीतल्या मुलांना योगासने शिकवा म्हणून आडून बसले होते. शाळा किती बेजबाबदार आहे आणि योगासारखी मूलभूत गोष्ट शाळा मुलांना ज्युनिअर केजीपासून का शिकवत नाही म्हणून टीकेची झोड उठवत होते. पण असले आग्रह धरणं अनेकदा मुलांसाठी हितकारक नसतं हे सांगूनही त्या पालकांना समजत नव्हतं. आपल्या मुलांच्या हिताचा विचार करत असताना अनेकदा पालकांच्या डोक्यातून ‘मुलांचं वय’ हा मुद्दा हरवून जातो आणि मग गल्लत होते. हेच अनेकदा शाळांच्या बाबतीतही होतं. माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या शाळेत ज्युनिअर केजीला असणारा अभ्यास बघून मी चक्रावून गेले. तिला विचारलं तर ती म्हणाली, शाळेचं म्हणणं आहे की सिनिअर केजीत मुलांना जड जातं म्हणून ज्युनिअर केजीतच सिनिअर केजीच्या अभ्यासाची सुरुवात करायला हवी.

मला त्या शाळेच्या विचार करण्याच्या पद्धतीवर हसावं की रडावं तेच समजलं नाही. जी गोष्ट सर्वसाधारणपणे सगळ्याच मुलांना सिनिअर केजीमध्येसुद्धा कठीण जाते तीच गोष्ट मुलं ज्युनिअर केजीत कसे काय शिकू शकतात?

पण पालक प्रश्न विचारत नाहीत आणि शाळा असले मूर्ख दृष्टिकोन घेऊन गुणांशी शर्यत करत राहते.

म्हणून शाळेत आपल्या पाल्याला टाकल्यावर कोणकोणत्या गोष्टींचा विचार हवा याबद्दल जरा चर्चा आवश्यक आहे.

माझ्या अनुभवातून आणि माझ्या मैत्रिणींना आलेल्या आणि त्यांनी माझ्याशी बोललेल्या अनुभवातून काही मुद्दे मी इथे मांडते आहे.

——-**——-

काय करायला हवं..!

– सगळा अभ्यास शाळेवर सोडण्याचे दिवस संपले आता.. शाळेतून अभ्यास घेतला जात असला तरी त्यावर पालकांची नजर असणं आवश्यक असतं. अनेकदा शुद्धलेखन, स्पेलिंग्ज अशा गोष्टी चुकीच्या शिकवल्या जाण्याची शक्यता असते. इंग्रजी उच्चारही अनेकदा चुकीचे शिकवले जाऊ शकतात त्यामुळे पालकांचं त्याकडे लक्ष हवं.

– काही शाळा नको इतक्या स्पर्धात्मक असतात. परीक्षा घ्यायच्या नाहीत असा सरकारी नियम असला, तरीही ‘ग्रेड्स’सारख्या गोंडस नावाच्या पाठामागून परीक्षाच घेतल्या जातात. त्यासाठी मुलांवर दबाव आणला जातो. पालकांना वेठीला धरलं जातं. त्यामुळे आपल्या पाल्याच्या शाळेत असले ताण आणणारे घटक नाहीत ना याकडे लक्ष दिलं पाहिजे.

– शाळांचे व्यावसायिकीकरण कुणीही आजच्या काळात टाळू शकत नाही. त्यामुळे शाळा व्यावसायिक झाल्या म्हणून आरडाओरडा करण्यापेक्षा पालकांचं संघटन अधिक महत्त्वाचं आहे. पालक संघटित असतील तर कुठलीच शाळा अवाजवी गोष्टी पालकांवर आणि मुलांवर लादू शकत नाही.

– शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे त्या आड कुठलाही घटक येत असेल तर पालकांनी सामूहिकरीत्या त्याविरोधात एकत्र येणं ही आजच्या काळाची गरज आहे.

– अव्वाच्या सव्वा पैसे शाळा घेत असली, तरी त्यांना त्यांचा दर्जा टिकवावाच लागतो हे कधीच विसरू नये. कारण जर दर्जा चांगला नसेल तर त्याबाबत बाहेर चर्चा होतेच आणि त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम शाळेच्या नव्या नाव नोंदणीत होत असतो. त्यामुळे शाळांना दर्जा टिकवावाच लागतो. त्याचप्रमाणे पालकांचाही दर्जा टिकवण्याबाबतचा दबाव शाळेवर असणं गरजेचं आहे.

——-**——-

काय टाळायला हवं..!

– शाळा आपल्याला लुबाडायला बसलेली आहे, असा दृष्टिकोन पालकांनी ठेवू नये. त्यामुळे प्रश्नांची उकल होत नाही. उलट आपला दृष्टिकोन विनाकारण दूषित होत जातो.

– शाळेच्या काम करण्याच्या पद्धतीत अतिरेकी ढवळाढवळ करू नये. खटकेल ते सांगितलेच पाहिजे; पण शाळा आणि शिक्षक यांना काहीच समजत नाही, असा दृष्टिकोन उपयोगाचा नाही.

– आपल्याला शाळेच्या किंवा शिक्षकांच्या काही गोष्टी खटकत असतील तरी त्याबद्दल मुलांसमोर चर्चा टाळावी. कारण त्यामुळे मुलांच्या मनात शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. ज्यामुळे मुलांना शाळा आवडेनाशी होऊ शकते.

– शाळा किंवा शिक्षक कितीही चुकीचे वागले तरी त्यांच्या चर्चा करताना संयम आवश्यक आहे. ती एक व्यवस्था आहे आणि ती एका झटक्यात बदलणार नाही, हे लक्षात घेऊन चर्चा केली पाहिजे.

– आपण ज्या शाळेत आपल्या मुलांना टाकणार आहोत त्या शाळेच्या मूलभूत विचारधारेचा परिणाम आपल्याला पाल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणो होणार आहे हा मुद्दा लक्षात घेऊन आपल्या पाल्याची शाळा निवडली पाहिजे. आणि आवश्यकता वाटल्यास बदललीही पाहिजे.

– शाळा हा काही फक्त मुलांचा विषय नसतो. आपल्या मुलांना शाळा जिव्हाळ्याची वाटण्यात, त्यांना ती झेपण्यात पालक म्हणून आई-बाबांची भूमिका तितकीच महत्त्वाची असते. शाळेशी गट्टी करून, शाळेशी संवाद साधून शाळेच्या मनावर मुलं आणि मुलांच्या मनावर शाळा ठसवता येते. यात पालकांची भूमिका नि:संदेह महत्त्वाची आहे.

– शिक्षकांच्या, शाळेच्या मूलभूत विचारधारेच्या कुठल्या गोष्टी पालक म्हणून आपल्याला खटकल्या तर त्या शाळेपर्यंत पोचवल्याच पाहिजेत. अर्थात, हे करत असताना शाळा आपलं ऐकेलच असं नाही. त्यामुळे आपण सुचवलेल्या गोष्टींची अंमलबजावणी होईल किंवा त्याकडे तितक्या गांभीर्यानं बघितलं जाईलच असं नाही, हे गृहीत धरायला हवं. पण तरीही गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. काही वेळा शाळांमधल्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांना त्या पटतात आणि बदल होतात.

– अनेक शाळांमधून पालक-शिक्षक मिटिंगच होत नाही. झाली तरी दोन-चार महिन्यांनी एकदा होते. अशावेळी दर महिन्याला शिक्षकांची वेळ घेऊन त्यांना भेटून आलंच पाहिजे. मिटिंग नाही म्हणून शिक्षकांशी संवादच नाही, असं होता कामा नये. मिटिंगसाठी आग्रह धरला पाहिजे.

– अवनी साठे

Leave a Reply

Your email address will not be published.