संत म्हटले की ते मध्ययुगीन महाराष्ट्रातलेच, अशी एक सर्वसामान्य कल्पना रूढ आहे. या कल्पनेला गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी छेद दिला आहे. अगदी अलीकडच्या काळातील हे संत असून त्यांना पाहिलेली, त्यांची कीर्तनं ऐकलेली, त्यांच्या कार्यासाठी वाहून घेतलेली असंख्य माणसं आजही आपल्याला महाराष्ट्रात आढळतात. या दोन्ही आधुनिक संतांना पाहण्याचं नि त्यांची कीर्तनं ऐकण्याचं भाग्य मलाही लाभलं होतं. योगायोग असा की, हे दोन्ही संत मूळचे विदर्भातले पण सर्वच मराठी माणसांनी त्यांना आपले संत मराठी माणसाचे संत मानले होते, एवढी त्यांची प्रभावकक्षा विस्तृत होती, व्यापक होती.

गाडगेबाबा यांचं जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव. ते परीट समाजातले होते, हे मुद्दाम सांगावं लागतं कारण त्यांनी कधीच जातिभेद मान्य केला नाही, त्यामुळं ते अमुक समाजातले होते, असं कसं म्हणता येईल?त्यांचं आडनाव जानोरकर असं होतं. त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी नि आईचं सखुबाई.

लहानपणापासूनच त्यांना डेबू किंवा डेबूजी म्हणत. घरची परिस्थिती, त्यामुळं मामाची गुरं सांभाळणं नि शेतीची कामं करण्यातच त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ गेला. अशा बिकट परिस्थितीत शिक्षण तरी कसं घेता येणार ? मात्र, कष्टाळू प्रवृत्तीमुळं ते शेतीची कामंही अत्यंत चांगल्याप्रकारे करू लागले. शेतकरी- कामकरी यांना किती कष्ट नि परिश्रम करावे लागतात नि किती हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागतं, याचीही कल्पना त्यांना येत गेली. श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व त्यांना कळलं व जनसामान्यांच्या वास्तव समस्या नि दु:खं त्यांना तीव्रतेनं जाणवली. समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाकाजी, धर्माविषयीच्या चुकीच्या कल्पना यांच्या विरोधात समाजजागरण करायला हवं, याचीही त्यांना जाणीव होऊ लागली. अशाप्रकारे त्यांच्या विचारांची जडणघडण बालपणापासूनच होत गेली. समाजजीवनाचं सूक्ष्म निरीक्षण व समाजाला योग्य शिकवण देऊन चांगल्या, सुसंस्कृत, बुद्धिवादी, विवेकनिष्ठ, सुसंस्कारयुक्त समाजाचं नवनिर्माण करण्याची आवश्यकताही त्यांना तीव्रतेनं भासली. यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेऊन स्वस्थ बसणं गाडगेबाबांसारख्या सत्पुरुषाला आवडणं शक्यचं नव्हतं.

समाजातील दारिद्र्य नि जातिभेदांमुळं निर्माण होणारी विषयता, त्याचप्रमाणं देवभोळेपणा हेच समाजाच्या कल्याणातले व प्रगतीतले अडसर आहेत. ते काढून टाकायला हवेत, या त्यांच्या मनातील विचार-बीजालाच पुढं अंकुर फुटले नि त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून या कार्यास प्रारंभ केला. देव दगडात नसून माणसात असतो, यासाठीच माणूस घडविणं, हेच आपलं ब्रीद असायला हवं, त्यासाठी शिक्षण घ्यायला हवं, या मताचा पुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केला. ज्या दलितांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही त्यांच्या शाळांसाठी आपल्या जागा दिल्या. जागोजागी गरीबांसाठी धर्मशाळा बांधल्या. कीर्तनाच्या प्रभावी माध्यमातून देव दगडात नसतो तर तो माणसात असतो, त्या माणसाचीच आपण सेवा करायला हवी या बुद्धिप्रामाण्यवादी विचाराचे सुसंस्कार गाडगेबाबांनी सर्वसामान्यांवर केले.

देवकीनंदन गोपाला, गोपाला हे त्यांच्या भजनाचं जणू ध्रुपदच होतं.

बाबा स्वत: तुकड्या तुकड्यांनी शिवलेली गोधडीची वस्त्रं नेसत. आज सामान्य माणसाला, मजूरांना, शेतकर्‍यांना धड अंगभर नेसायला मिळत नाहीत, मग आपणही त्यांच्यासारखंच राहायला नको का? हा विचार यामागं असावा. महाराष्ट्रातील धर्मविचार नितळ, निकोप, निष्कलंक, निरपेक्ष, शुचिर्भूत करण्यासाठी बाबांनी उभी हयात वेचली. नव्या विचारांचं स्वागत नि पूर्वीच्या अनिष्ट प्रथांना निरोप हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता, गाभा होता. त्यांनी समाजातील व्यसनाधिनतेवर कठोर प्रहार केले. धर्माचं अत्यंत नितळ मूळ रूप त्यांनी समाजासमोर ठेवलं. जुन्या वाईट प्रथा, रुढी यांना प्रखर विरोध केला. धर्माचं नितळ रुप समाजा समोर ठेवलं ग्रामस्वच्छतेसाठी जागोगाग प्रसार केला. त्यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं अमरावती विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं व त्यांच्या नावानं ग्रामस्वच्छता पुरस्कार देण्याची योजनाही कार्यान्वित केली आहे.

डॉ.यू.म.पठाण

Leave a Reply

Your email address will not be published.