जगाच्या अखेरच्या घटके आधी मनू ने महाकाय जहाज बनवले होते आणि त्यात मानव जात, प्राणीजात पशु पक्षी, अन्नधान्य, जीवनाच्या अत्यंत गरजेच्या वस्तू त्याने भरून या महाकाय संकटातून पुन्हा जग निर्मिती साठी अमूल्य योगदान दिले होते. जगाचे अस्तित्व त्या  मनु मुळे पुन्हा जाणवले आणि सृष्टीची निर्मिती झाली.

आपण ह्या गोष्टी जेव्हा ऐकतो तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही. हे जग निर्माण होण्यासाठी किती युगे गेली असतील. आज आपण मोठ्या आनंदाने जगतो पण प्रकृती च्या मनात जेव्हा जेव्हा ताळमेळ खराब झाल्याने ते संतुलित करायचे ठरते तेव्हा आपल्याला अनेक घटनांना तोंड द्यावे लागते. प्रकृती च्या पुढे मानवाचे काही चालत नाही.

प्रत्येकाच्या जगण्याला काहीतरी अर्थ हा असतोच. त्या साठी देवाने जे योजिलेले असते ते आपल्या ग्रहांच्या अनुषंगाने आपल्या राशीत उतरते. त्याच्या प्रभावाखाली आपण आपले अस्तित्व कायम ठेवतो. पुण्यकर्मा च्या रूपाने कर्तव्य पार पाडत असताना जीवनाच्या अंतर्भागात आपल्या भूतकाळातील किंवा गतजन्मातील घटनांना आणि त्यातील संचिता ला गृहीत धरले जाते. आज आपण काय आहोत हे सिद्ध करण्यासाठी मानव हर तऱ्हेने प्रयत्न करतो. वाळवंटात सुद्धा निवडुंगा बरोबर फुले आपले अस्तित्व टिकवून ठेवतातच ना? संकटात जो हार मानत नाही तोच तर खरा योद्धा. मोगलाई च्या जाळ्यातून शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदुत्वाचे अस्तित्व टिकवून ठेवले ते त्यांच्या अपार साहस, बुद्धिमत्ता आणि चातुर्या मुळेच. भल्याभल्यांनी मराठी भाषेचे अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न केला पण तरी आपली मराठी भाषा ताठ मानेने अजून उभी आहे आणि हेच तर खरे युद्ध असते .आपले अस्तित्व टिकवण्यासाठी, जो जंग आपण पछाडत असतो तो सफल संपूर्ण होण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे. आज जगात एकमेकांच्या राष्ट्रांचे भाग आपल्या ताब्यात घेण्याच्या इर्षेपोटी गरीब, मासूम नागरिकांचे नाहक बळी जाताना आपण पाहतो. माणुसकी कुठे राहिली नाही. आपली सत्ता गाजवण्यासाठी क्रूर माणसे कुठच्या थराला  किती जातील हे सांगता येत नाही पण तरीही युक्रेन आपले अस्तित्व इतक्या दिवसाच्या युद्धानंतर सुद्धा टिकवून आहे.

जन्म घेतलेला प्रत्येक जण हा कधी ना कधी अनंतात विलीन होतोच. माणसाला अमरत्व नाही पण मृत्यूनंतर सुद्धा आपला आत्मा आपले अस्तित्व छोट्या छोट्या गोष्टीतून, रूपातून जाणवून देतो. पुनर्जन्माच्या कहाण्यांमधून हे अधिक प्रखरतेने स्पष्ट होते. मोठे मोठे राजे राजवाडे, किल्ले, ग्रंथालये, संग्रहालये आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्या स्थळांना भेट देताना आपल्या अंगावर कधी रोमांच तर कधी काटे आल्याशिवाय राहत नाही. मला तरी अनुभव आला आहे. तुम्हाला काय वाटते?सांगा हां….

भेटूया पुढच्या लेखात……… धन्यवाद

लेखिका:- सौ साधना अणवेकर

Leave a Reply

Your email address will not be published.